Tuesday, January 27, 2026

नोकरीच्या 17 वर्षाच्या निमित्ताने...

🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*

🎯 *नोकरीच्या 17 वर्षाच्या निमित्ताने...*

🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*


27 जानेवारी 2009. त्या दिवशी हातात नेमणूकपत्र होतं आणि मनात असंख्य प्रश्न. पुढचा प्रवास कसा असेल ? जमेल का ?टिकेल का ? याचीच धाकधूक जास्त होती. चारशे किलोमीटर दूर असलेली पालघर मधील टेन मराठी शाळा म्हणजे फक्त पहिली शाळा नव्हती, तर ती आयुष्याला वळण देणारी पहिली परीक्षा होती. ओळखीशिवाय, आधाराशिवाय, फक्त स्वतःवरच्या विश्वासावर सुरू झालेला तो प्रवास आज 27 जानेवारी 2026 ला 17 वर्षांचा झाला आहे.


या सतरा वर्षांत अनेक शाळा बदलल्या. पापर्डे, कडवे बुद्रुक, अंगापूर नं. १, बागणी नं. २… प्रत्येक शाळेने, गावाने काहीतरी दिलं, काहीतरी शिकवलं. कधी वर्गातल्या बाकांवर बसलेली मुलं शिकवत होती, तर कधी त्या गावातली परिस्थिती. पाटीवर लिहिताना हात थरथरला असे दिवसही आले आणि विद्यार्थ्यांच्या यशाने डोळे पाणावले असे क्षणही आले. या प्रवासात शाळा फक्त कामाची जागा राहिली नाही; ती घर झाली.


सतराव्या वर्षात मात्र मन जरा जास्तच जड झालं. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अपेक्षित यश मिळालं नाही. प्रयत्नांची कमतरता नव्हती, मेहनतीत उणीव नव्हती; तरीही गुणवत्ता यादीत एकही नाव दिसलं नाही. शिक्षक म्हणून तो धक्का खोलवर बसला. वर्गात हसणारी तीच मुलं आठवली आणि मनात सतत एकच प्रश्न घुमत राहिला, आपण कमी पडलो का ? ही सल मनातून सहज निघून जाणारी नव्हती.


पण, त्याच काळात आयुष्याने वेगळाच दिलासा दिला. ‘माझ्या गावचा धडा’ या उपक्रमात तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. स्वतः लिहिलेले धडे आठ पुस्तकांत छापून आले. हे फक्त छापील शब्द नव्हते; ते माझ्या अनुभवांचं प्रतिबिंब होतं. त्याच वर्षी ‘यशवंत प्रश्नमाला’ चा जन्म झाला. या उपक्रमामुळे राज्यभरातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकमेकांशी जोडले गेले. कुठेतरी वाटलं, आपल्या प्रयत्नांचा अर्थ आहे.


या वर्षाने मान सन्मानही दिला. तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य स्पर्धांमधील प्रथम क्रमांक, विज्ञान प्रदर्शनातील द्वितीय क्रमांक, विद्यार्थिनींसाठी मिळवून दिलेली शालेय किट्स, शाळेसाठी मिळवलेला लॅपटॉप. या सगळ्या गोष्टी यशाच्या वाटल्या तरी त्यामागे एकच भावना होती, आपण काहीतरी चांगलं करू शकतो, याचा मिळालेला विश्वास.


आता अठराव्या वर्षाकडे पाहताना थकवा नाही, उलट नवी ओढ आहे. ‘यशवंत प्रश्नमाला’ आतापर्यंत डिजिटल स्वरूपात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. आता तीच प्रश्नमाला लिखित स्वरूपात, मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच म्हणून साकार करण्याचा संकल्प आहे. तो नव्या रूपात, नव्या जबाबदारीने पुढे चालूच आहे. कारण हा प्रवास अजून संपलेला नाही. 


या सतरा वर्षांच्या प्रवासाकडे मागे वळून पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, हा प्रवास मी एकट्याने केलेला नाही. या वाटेवर भेटलेला प्रत्येक माणूस माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. म्हणून आज या प्रवासात साथ दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानावेसे वाटतात.


ही सतरा वर्षे मला एक गोष्ट शिकवून गेली, यश म्हणजे नेहमी निकालाच्या आकड्यांत मोजता येत नाही. कधी ते मुलाच्या आत्मविश्वासात दिसतं, कधी समाजाच्या विश्वासात आणि कधी स्वतःच्या अंतःकरणात शांतपणे उमटलेल्या समाधानात. पुढचा प्रवासही असाच राहील, कष्टांचा, प्रामाणिकपणाचा आणि आशेचा.


धन्यवाद...!