🎯 *यशवंत - एक प्रेरणास्रोत*
🎯 *कु. वैष्णवी महेश कुंभार हिच्या कविता संग्रह प्रकाशनाच्या निमित्ताने*
🎯 *श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.*
बागणी गावातील कु. वैष्णवी महेश कुंभार, इयत्ता दहावीची विद्यार्थिनी, हिचा कवितासंग्रह ‘काव्याष्णवी’ प्रकाशित झाला आहे. या संग्रहासाठी प्रस्तावना लिहिण्याचा मान मला मिळाला, हे माझ्यासाठी केवळ औपचारिक नाही तर मनाला भिडणारे समाधान आहे.
एका दहावीच्या मुलीच्या वहीतून उमटलेले शब्द आज पुस्तकाच्या रूपात वाचकांपर्यंत पोहोचत आहेत, हे पाहताना एक लेखक म्हणून मनाला खूप आनंद होतो. वैष्णवीच्या कवितांमधील प्रामाणिक भावना, तिची संवेदनशील नजर आणि शब्दांशी असलेली नाळ मला नेहमीच भावते.
तिची लेखणी अशीच समृद्ध होत जावो, तिचे विचार अधिक रुंद व्हावेत आणि तिची वाटचाल आत्मविश्वासाने पुढे जावी, ही मनापासूनची इच्छा.
वैष्णवीला तिच्या भावी साहित्यिक आणि वैयक्तिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिल्याबद्दल वैष्णवीचे आजोबा श्री. शशिकांत कुंभार, वडील श्री. महेश कुंभार आणि आई सौ. कविता कुंभार तसेच संपूर्ण कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार.
वैष्णवीच्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.
कविता संग्रहासाठी दिलेली प्रस्तावना
प्रस्तावना
वैष्णवी महेश कुंभार ही इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असून तिची कविता लिहिण्याची ओढ लहानपणापासूनची आहे. सातवी आठवीपासून शब्दांशी मैत्री करत तिने आपल्या भावविश्वाला कवितेच्या रूपात मांडायला सुरुवात केली. तिच्या कवितांमध्ये वयाच्या पलीकडची जाण, अनुभवांची प्रामाणिक मांडणी आणि भावनांची सहज अभिव्यक्ती दिसून येते.
वैष्णवी ही इयत्ता चौथीची माझी विद्यार्थिनी कु. शर्वरीची मोठी बहीण. तसेच, ती आमच्या जिल्हा परिषद शाळा बागणी नं 2 ची माजी विद्यार्थिनी. एकदा शर्वरीने सहजपणे सांगितले की, तिची बहीण कविता करते. कुतूहलातून मी वैष्णवीला तिची कवितांची वही घेऊन भेटण्यास सांगितले. त्या कवितांचे वाचन करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या कविता केवळ शालेय प्रयत्न नाहीत, तर त्या मनाला स्पर्श करणाऱ्या, संवेदनशीलतेतून जन्मलेल्या रचना आहेत.
दहावीच्या विद्यार्थिनीने इतक्या परिपक्वतेने व्यक्त केलेल्या भावना पाहून तिला कवितासंग्रह प्रकाशित करण्याबाबत सुचवावेसे वाटले. या सूचनेला वैष्णवीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपल्या कवितांना एकत्र आणून संग्रहाच्या रूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला.
या प्रवासात तिला आजोबा श्री. शशिकांत, वडील श्री. महेश आणि आई सौ. कविता यांचे सतत प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले. कुटुंबाचा हा विश्वास आणि आधार तिच्या लेखनात आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला आहे.
‘काव्याष्णवी’ या नावाने साकार झालेला हा कवितासंग्रह म्हणजे वैष्णवीच्या भावविश्वाचा प्रामाणिक आविष्कार आहे. वाचकांना तिच्या कवितांमधून निरागसता, संवेदनशीलता आणि विचारांची स्पष्टता नक्कीच अनुभवायला मिळेल, असा विश्वास वाटतो.
श्री. संदीप पाटील सर
दुधगांव, 9096320023
धन्यवाद...!

