माझ्या आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ हरपला...
![]() |
| आदरणीय कांबळे सर यांचे सोबतचा शेवटचा फोटो... |
दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी शाळेत असतानाच माझ्या गावातील श्री अविनाश कुदळे दादांनी एक मेसेज पाठवला आणि तो वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे बारावीचे वर्गशिक्षक, माझ्या आयुष्याला दिशा देणारे श्री. पी. आर. कांबळे सर यांचे पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. मन सुन्न झाले. शाळेत असलो तरी ठरवलं, काहीही झालं तरी आज कसल्याही परिस्थितीत सरांचे अंतिम दर्शन घ्यायचेच.
मी आणि माझा मित्र पंकज संध्याकाळी 7 वाजता सरांच्या सांगलीतील घरी पोहोचलो. तिथे गेल्यावर सरांच्या पत्नी, त्यांचा मुलगा अनंत आणि सूनबाई यांचा आक्रोश पाहून काळीज पिळवटून निघाले.
सरांच्या पार्थिवाकडे पाहताना डोळ्यांसमोरून आठवणींचा एक मोठा पट उलगडत होता. मागील वर्षी जानेवारी 2025 मध्ये सांगली हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात सरांची भेट झाली होती. तो दिवस किती छान होता..! सरांनी मला, पंकजला आणि हजारे सरांना स्वतः पूर्ण सांगली हायस्कूलचा परिसर फिरून दाखवला होता. आवर्जून आम्हाला आमच्या बारावीच्या वर्गात घेऊन गेले होते. तो त्यांचा उत्साह, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आजही जसाच्या तसा आठवतोय. वाटलेच नव्हते की ती आमची शेवटची भेट ठरेल.
माझ्यासारख्या एका ध्येयहीन मुलाला ध्येयाने प्रेरित करणारा हा अवलिया होता तरी कसा ? हे आठवताना मला आजही गहिवरून येते. २००३ सालची गोष्ट. मी दहावी उत्तीर्ण झालो होतो. विज्ञानाची आवड नव्हती म्हणून कॉमर्सला जायचे ठरवले, पण माझ्याच हलगर्जीपणामुळे प्रवेशाची वेळ टळून गेली होती. अखेर आमच्या गल्लीतील श्री. महावीर वाडकर, श्री. संजय कोळी व लतिका पाटील खिडबिडे यांच्यामुळे मला सांगली हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. तिथेच माझी पहिली भेट कांबळे सरांशी झाली. हीच व्यक्ती पुढे जाऊन माझे आयुष्य बदलून टाकेल, याची मला तेव्हा किंचितही कल्पना नव्हती.
मी त्यावेळी मार्केट यार्डमध्ये दिवाणजी म्हणून काम करत होतो. सकाळी 7 ते 11 कॉलेज आणि मग काम, अशी माझी धावपळ असायची. अकरावीला अभ्यासाकडे माझे लक्षच नव्हते, तरीही पास झालो. बारावीत गेलो आणि कांबळे सर आमचे वर्गशिक्षक झाले. मी मात्र पूर्वीसारखाच बेफिकीर होतो. कॉलेजने 'टॅलेंट बॅच' सुरू केली, त्यात माझी निवड झाली, पण सराव चाचण्यांमध्ये सर्व विद्यार्थ्यांत मलाच सर्वात कमी गुण मिळत असत.
माझी ही 'प्रगती' पाहून एक दिवस सरांनी मला स्टाफरूममध्ये बोलावले. माझ्या घरच्या परिस्थितीची अतिशय आपुलकीने चौकशी केली आणि मला म्हणाले, "संदीप, मोठं काहीतरी करायचं असेल, तर नोकरी सोडून अभ्यासावर लक्ष दे."
त्या एका क्षणाने आणि त्या दोन वाक्यांनी माझ्या काळजात घर केले. हा क्षण माझ्या आयुष्याचा 'टर्निंग पॉईंट' ठरला. मी नोकरी सोडली आणि रात्रंदिवस एक करून, झपाटून अभ्यास केला. जेव्हा निकाल लागला, तेव्हा वर्गशिक्षक म्हणून सरच मार्कलिस्ट वाटत होते. मी मार्कलिस्ट हातात घेताना सरांना विचारले, "सर, पहिला नंबर कोणाचा आला?" तेव्हा त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती, ते आनंदाने म्हणाले, "संदीप, तुझाच!" मी वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो.
त्या एका क्षणाने मला माझ्या आयुष्याची नवी दिशा दिली. पुढे मी डी.एड. केले आणि आज एक प्राथमिक शिक्षक म्हणून गेली 17 हून अधिक वर्षे यशस्वी जीवन जगत आहे. हे केवळ आणि केवळ पी. आर. कांबळे सरांमुळे शक्य झाले. मला सहकार आणि व्यापार संघटन शिकवणारे ते केवळ एक शिक्षक नव्हते, तर माझ्या आयुष्याचे शिल्पकार होते.
सर स्वतः अतिशय गरीब आणि कष्टकरी कुटुंबातून आले होते. अलकुंडसारख्या छोट्या गावातून येऊन, पुढे 'कमवा आणि शिका' योजनेतून त्यांनी शिक्षण घेतले. प्रसंगी दगडखाणीत हातात पार घेऊन, पोटाला चिमटा काढून आणि अनेक अपमान पचवून त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले होते. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीत शिक्षक म्हणून सुरू झालेला त्यांचा खडतर प्रवास सांगली हायस्कूलच्या उपप्राचार्य पदापर्यंत पोहोचला आणि 31 मे 2021 रोजी ते सेवानिवृत्त झाले. अत्यंत शिस्तप्रिय, पण तितकेच विद्यार्थीप्रिय, संयमी आणि निस्वार्थी असे ते व्यक्तिमत्त्व होते.
स्वतः अनेक संकटांचे घाव सोसत त्यांनी माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्याला आकार दिला. आज तोच मूर्तिकार, तोच दीपस्तंभ कायमचा हरपला आहे. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून न येणारी आहे.
माझा आदर्श असणाऱ्या कांबळे सरांना भावपू
र्ण श्रद्धांजली...!
