पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाची मंगल समाप्ती : संयम, श्रद्धा आणि सेवा यांचा जागर
शुभस्थान दुधगांव येथील श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचा जिर्णोद्धार व नूतन जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव रविवार, ४ मे ते शनिवार, १० मे २०२५ या कालावधीत उत्साह, भक्तिभाव आणि अध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्याने दुधगांव नगरीचे वातावरण मंगलमय आणि पावन करून टाकले.
१९८६ साली माझ्या जन्मापूर्वी दुधगाव मध्ये पंचकल्याण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तदनंतर ३९ वर्षांनी हा पावन योग अनुभवण्याचा पुण्यलाभ झाला. याचा विशेष आनंद मला आहे.
या महोत्सवात पंचकल्याणकांचे गर्भ, जन्म, दीक्षा, केवलज्ञान आणि मोक्ष या सर्व कल्याणकांचे मंत्रमुग्ध करणारे सजीव चित्रण, विविध धार्मिक विधी, भक्तिमय मिरवणुका, रथोत्सव, भावगिते आणि पूजाविधी यांची परिपूर्ण सांगड होती. प्रत्येक दिवशी पहाटेपासून रात्रीपर्यंत चाललेल्या कार्यक्रमांमध्ये माझ्यासह हजारो भाविकांनी उपस्थित राहून धर्मलाभ घेतला.
गर्भसंस्कार, मौजीबंधन व विद्याप्राप्ती संस्कार या विशेष कार्यक्रमांना भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जैन संस्कृतीतील श्रेष्ठ संस्कारांचे महत्त्व या निमित्ताने सर्वत्र पोहोचले.
प. पू. मुनि श्री १०८ विद्यासागरजी मुनिमहाराज ससंघ, प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, नांदणी,
यांच्या पावन उपस्थितीमुळे महोत्सवाला दिव्यता प्राप्त झाली. विद्यासागरजी महाराज यांचे प्रवचन, उपदेश आणि मार्गदर्शन हे माझ्या मनात आध्यात्मिक ऊर्जा आणि संयमाचे बीज पेरणारे ठरले. या पूजेच्या निमित्ताने प. पू. मुनि श्री १०८ निर्लोभसागरजी महाराज यांना आहार देण्याचे पुण्य देखील लाभले. तसेच संगीत आरतीच्या माध्यमातून पार्श्वनाथ भगवंतांची आरती करण्याचे भाग्यही लाभले.
या महोत्सवासाठी दुधगांव मधील सर्व धर्मियांनी शारीरिक, मानसिक सहकार्यासोबतच आर्थिक सहकार्य करत भरभरून प्रतिसाद दिला. यामुळेच, पंचकल्याण महोत्सव केवळ जैन धर्मियांपुरता मर्यादित न राहतात, संपूर्ण दुधगांव चा उत्सव बनला.
या महोत्सवाने पुन्हा एकदा दाखवून दिले की दुधगांव ही केवळ धार्मिक परंपरा जपणारी भूमी नाही, तर ती त्यागी, संयमी व साधकांची पवित्र भूमी आहे. येथे जन्मलेले मुनिवर्य, आर्यिकामाताजी आणि क्षुल्लकांची परंपरा ही दुधगांवचा अभिमान आहे.
या पंचकल्याणक महामहोत्सवाने प्रत्येक उपस्थितांच्या मनामध्ये धर्मनिष्ठा, संयम आणि सेवा यांचे बीज रोवले आहे. हा महोत्सव धर्मप्रेमाचा, एकात्मतेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा दीपोत्सव होता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. श्रावक - श्राविकांच्या ओसंडून वाहणाऱ्या श्रद्धेमुळे ही पंचकल्याण पूजा स्मरणीय झाली.
या नयनरम्य सोहळ्याची यशस्वीता ही समस्त श्रावक-श्राविक, स्वयंसेवक व पंचकल्याणक समितीच्या अविरत परिश्रमाचे फलित आहे. प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत निष्ठेने व सेवाभावाने पार पाडल्या. शिस्तबद्ध कार्यक्रम, स्वच्छतेची दक्षता, भाविकांसाठी केलेली भोजन व्यवस्था व व्यवस्थापन कौशल्य याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
शेवटी हा महोत्सव यशस्वी करण्यात हातभार लावलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद...!
जय जिनेन्द्र...!
No comments:
Post a Comment