Wednesday, June 25, 2025

बागणीची भावई



यशवंत - एक प्रेरणास्रोत 

बागणीची भावई 

मी कोण आहे ? या श्री. कृ. भा. बाबर यांच्या पुस्तकातून...

मे महिन्याच्या सुट्टीत जिल्हा परिषद सांगली येथे जाणे झाले. माझ्या गावचा धडा मधील त्रुटी तपासणीसाठी बोलावणं आलं होतं. यावेळी श्री. विजय बक्षी यांचेशी भेट झाली. ते सांगली शिक्षण संस्थेत ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. त्यांचं वाचन लेखन अतिशय उत्तम. त्यांना सांगली जिल्ह्याचा इतिहास अगदी तोंडपाठ आहे. त्यांनी वाळवा तालुक्याचे पुस्तके अगदी लक्षपूर्वक तपासली. यादरम्यान मी बागणी शाळेत कार्यरत आहे. असे समजताच त्यांच्याशी जवळीक वाढली. बागणीच्या इतिहासात आणखी काय अंतर्भूत असायला हवे ? याबद्दल त्यांनी खूप माहिती दिली. दुसऱ्या दिवशी त्यांनी अगदी आठवणीने श्री. कृ. भा. बाबर यांचे "मी कोण आहे ?" हे पुस्तक वाचायला दिले. या पुस्तकात दुधगाव चा काही संदर्भ वाचायला मिळाला. तसेच भूतकाळात बागणीची भावई कशी होती ? हे ही वाचायला मिळाले. 


सध्या आष्टा शहरात भावई उत्सव उत्साहात सुरू आहे. या निमित्तानेच श्री. कृ. भा. बाबर यांचे "मी कोण आहे ?" या पुस्तकात वर्णन केलेली भावई जशीच्या तशी वाचनासाठी उपलब्ध करून देत आहे... *पुस्तक उपलब्ध करून दिले बद्दल श्री. विजय बक्षी सर यांचे आभार....*



शेजारच्या अष्टे गावाप्रमाणे आमच्या बागणी गावी पूर्वी भावईचा सण चांगला साजरा होत होता. अष्ट्याला तसा तो अजूनही चालू आहे म्हणतात. हा खेळ सामान्यतः बैत्याबलुत्यांचा होता. काही लोक 'चिटक्यामिटक्या' म्हणून निरनिराळी सोंगे घेऊन गाणी म्हणत गावातून मिरवणुका काढीत. 'पिसे' म्हणून न्हावी लोक तोंडाला व अंगाला काळे पट्टे ओढून व डोक्याला लिंबाचे डहाळे बांधून आणि हातात एक लिंबाचा डहाळा घेऊन घरोघर जात. लोक आपल्या घराच्या उंबऱ्यावर कापसाचा पेळू व खोबऱ्याचा तुकडा ठेवीत. हे पिसे त्या उंबऱ्यावर लिबाचा डहाळा आपटीत व पेळू आणि खोबऱ्याचा तुकडा घेऊन दुसऱ्या घरी जाई. पिशाने कंबरेला बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा चाळ बांधलेला असे. पिसे बोलत नसे. मौन धारण करी, चाळ वाजला की पिसे आले समजायचे. त्याला बघायला व त्याच्यामागे हिंडायला गावातली लहान लहान मुले जमत. ह्या भावईत 'जोगण्या' निघत.


आमच्या गावाला एक भुईकोट किल्ला आहे. पूर्वी विजापूरकर आदिलशाहीचे ते एक लहानसे ठाणे होते, मिरज व पन्हाळा यांच्या दरम्यानचे ते ठाणे होते. ह्या किल्ल्यात पेवासारख्या एका लहान खड्यात एक काशाची मोठी वाटी ठेवलेली असे. पाटील कुलकर्णी एके दिवशी वाजतगाजत जाऊन त्या खड्ड्यावर ठेवलेला मोठा थोरला दगड पहारेने बाजूला सारून ती वाटी आणीत. ह्या वेळी त्या खड्ड्यात बेडूक, उंदीर वगैरे प्राणी निघत. त्यावरून चालू साली पावसाळा कसा होईल ? हे ठरवीत. अलीकडे पुष्कळ वर्षे झाली, हे सारे बंद पडले आहे. आमच्या लहानपणी ते चालू होते. पावसाळयाच्या आधी हा सण येत असे. ही जी काशाची वाटी असे ती हातात धरून संध्याकाळी 'जोगण्या' निघत. वीर पुरुषाचा पोशाख केलेले दोघेजण हातात नागव्या तरवारी घेऊन गावाभोवती मिरवत जात. एक जोगणा असे व एक जोगणी असे. जोगणा लिंगायत वाण्याचा असे व जोगणी कुंभाराची असे. दोघेही पुरुषच असत. कुंभाराच्या पुरुषाला स्त्रीचे - वीरस्त्रीचे रूप देण्यात येत असे, जोगण्या वाजतगाजत हालग्या वाजवीत, गावाभोवती वेढा घालून गोठणावर येत. तेथूनच ते निघतही.


गावाभोवतालची ही जोगण्यांची प्रदक्षिणा चालू असताना परगावच्या कोणी येऊन जर जोगण्यांच्या हातातील वाटी पळवून नेली, तर गावाचे यश गेले असे समजत. ह्या जोगण्यांच्या बरोबर मीही गावाभोवती हिंडलो आहे. माझ्या वडिलांचे मित्र मानाप्पा कुंभार हे जोगणी झालेले व पेठेतील म्हादु जोगण्या हे 'जोगणा' झालेले मी पाहिले आहेत. जोगणा किंवा जोगणी हे शब्द योग, योगिनी ह्यावरून निघालेले दिसतात. गावाच्या यशाच्या रक्षणासाठी योगी किंवा योगिनी बनून हे लोक हा खेळ खेळत होते, असे दिसते.


नंतर भावईत एके दिवशी मकोटे (मुखवटे ) निघत देवीचे मुख केलेले सुमारे दोन अडीच हात लांबीचे दोन मुखवटे असत. ते डोक्यावर घेऊन हा खेळ खेळायचा. हे मुखवटे दोन असत, ते महादेवाच्या देवळात ठेवलेले असत. वीर पुरुषाचा पोशाख केलेले व दिवसभर उपवास केलेले दोघेजण हे मुखवटे डोक्यावर घेऊन वाजत गाजत निघत. एकजण पुढे अरगडी झालेला असे. ह्या अरगड्याने लिंबाचा डहाळा बांधलेले एक सूप डोक्यावर बांधलेले असे. हा अरगडी मुखवट्यापासून साधारणपणे पंधरा वीस पावलांवर पुढे उभा राही. गुरव शिंग वाजवीत असे. 'चुंगथू' 'भुंगयू' असा त्याचा आवाज निघे. तीन वेळा शिंग वाजवून झाले की अरगडी पुढे पळायचा व मुखवटे धारण केलेल्या दोघांपैकी एकजण त्याच्या मागे लागायचा मुखवटे घेतलेल्या माणसाच्या व अरगडचाच्याही हातात काठी असे. मुखवटे धारण केलेल्या माणसाने अरगड्याला गाठून जर त्याच्या सुपावर काठी मारली, तर तो अरगडी झालेला गृहस्थ काही दिवसांनी झिजून झिजून मरण पावतो. अशी समजूत होती. म्हणून अरगडी झालेला माणूस पळता पळता आजूबाजूला बघायला उभं राहिलेल्या लोकात हळूच घुसत असे. मग मकोटा परत फिरायचा आणि अरगडी त्याच्या मागोमाग जायचा. एखाद्या वेळी हा अरगडी आपल्या हातातील काठीने मुखवट्याला हळूच डिवचायचा. तसे झाले की मुखवटा लगेच मागे फिरून त्याचा पाठलाग करायचा. एका मुखवट्याची बारी झाली की, दुसरा मुखवटा स्वारीवर निघायचा. पळून परत फिरताना त्या मुखवट्याबरोबर निघायचा. हलगीवाले वाजंत्री आपली वाद्ये वाजवीत असत. 'देवी राक्षसाला मारायला धावते आहे' हा देखावा ह्या मुखवट्याच्या खेळाने दाखविला जात असे. आमच्या नानांनी एके वर्षी मुखवटा धारण केलेला होता आणि त्यांचे भेदीक गाण्यातील जोडीदार सुरते बाळू रेन्रेकर हे अरगडी झालेले होते. मी रात्रभर हा खेळ पाहायला हजर होतो.

No comments: