Thursday, May 21, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 154

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत
🎯  भाग - 154
🎯  श्री.संदीप पाटील,दुधगाव. 9096320023.

_माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील होण्यासाठी वरील क्रमांकावर नाव आणि पत्ता(जिल्हा)पाठवा._

केवळ मेट्रिक पास असलेला एक तरुण, स्वतःचे मोठे स्वप्नं घेऊन मुंबईमध्ये आला. तेव्हा त्याच्या खिशात केवळ पाचशे रुपयेच होते. परंतु काही वर्षातच त्याने हजारो कोटी रुपयांचे साम्राज्य उभं केलं. त्याला हे कसं शक्य झालं ? इतका प्रचंड पैसा त्याने कसा कमावला ? काय आहे त्याच्या यशाचं गुपित ? कोण आहे तो यशवंत ? जाणून घेऊ आजच्या भागात चला तर मग...

28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमधील एका छोट्याशा खेड्यात एका शिक्षकाच्या घरात धीरज असा जन्म झाला. मिळणार्‍या तुटपुंज्या पगारात घर चालवणे त्याच्या वडिलांना शक्य नव्हते. त्यामुळे अगदी बारा-तेरा वर्षे वयातच धीरजला घर चालवण्यासाठी कामधंदा करावा. कधी तेल तर कधी भजी विकून आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा. धीरज शिक्षणात फारसा हुशार नव्हता. त्यामुळे शिकण्यात त्याला फारसा रस नव्हता. शिकण्याऐवजी एखादा काम धंदा करण्यावर त्याचा विशेष भर असायचा. याच काळात धीरज ने एक मोठा उद्योगपती होण्याचं स्वप्नं पाहिलं.

1948 साली म्हणजेच मेट्रिक पूर्ण झाल्यानंतर, वयाच्या अगदी सोळाव्या वर्षीच तो आपल्या भावाच्या मदतीने येमेन या देशात नोकरीसाठी गेला. तेथे त्याने पेट्रोल पंपावर अगदी अत्यल्प पगारावर नोकरी पत्करली. या काळात तो शांत बसला नाही. याकाळात त्याने व्यवसायातील बारीक मोठे बारकावे शिकून घेतले. पेट्रोल पंपावर काम करतानाच त्याने काही बारीकसारीक कामे करायला सुरुवात केली. शिवाय येमेनमधील गुजराती पेढ्यां सोबत काम करायला सुरुवात केली.कार्यकुशलतेच्या आणि योग्यतेच्या जोरावर तो मॅनेजर पदापर्यंत पोहोचला.

1958 मध्ये धीरज भारतात परतला आणि आपल्या स्वप्नाचा पूर्तीसाठी मुंबई मध्ये स्थायिक झाला. सुरुवातीला आपल्या एका नातेवाईकाच्या सोबतीने एका आयात निर्यात करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. परंतु काही वर्षातच भागीदारी संपुष्टात आली. मग त्याने स्वतः च एका कापड कंपनीची सुरुवात केली. अनेक अडचणी, समस्या  आल्या. पण, धीरज डगमगला नाही. त्याने धैर्याने तोंड दिले आणि स्वतःचा नवा ब्रँड बाजारात आणला. धीरज च्या कठोर परिश्रमाने व्यवसायाचा विस्तार वाढू लागला. आपल्या कंपनीचा आयपीओ बाजारात आणला. कंपनीची विजयी घोडदौड सुरूच राहिली. 1999 साली धीरज ला बिजनेस इंडिया-बिजनेस मॅन आॅफ द ईयर सन्मानाने गौरविण्यात आले आणि सन 2000 साली तो भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. तो धीरज म्हणजेच धीरुभाई अंबानी होय.

धीरूभाई यांच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकली तर तीन महत्त्वपूर्ण बाबीं लक्षात येतात.  पहिली बाब कोणताही व्यवसाय छोटा अथवा मोठा नसतो. दुसऱ्या बाब तुम्ही कितीही गरीब असा परंतु तुमचा विचार श्रीमंत (मोठा) असायला हवा. तिसरी बाब तुमची स्वप्नं मोठी असायला हवीत. ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला झोकून दिले पाहिजे. ‘‘जे स्वप्नं पाहाण्याची हिम्मत ठेवतात ते अवघ्या विश्वावर राज्य करू शकतात’’.

धीरूभाईंनी ज्यावेळी मुंबईत पाऊल टाकले होते, त्यावेळी त्यांच्या खिशात केवळ पाचशे रुपये होते. आणि जेव्हा त्यांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 62 हजार कोटी रुपयांची होती. आपल्या दृढसंकल्प आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवलं. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद..



🎯 *भाग - 153* वाचण्यासाठी 👇येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/05/153.html

No comments: