Monday, April 6, 2020

यशवंत - एक प्रेरणास्रोत भाग - 138

🎯  यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯  भाग - 138

( STAY HOME, STAY SAFE... ~GO CORONA~...)

https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2020/04/138.html


बऱ्याच जणांना "आजीबाईचा बटवा" म्हणजे काय ? हे माहीतच असेल. 'आयुर्वेदिक’ पदार्थाचा खजिना म्हणजे "आजीबाईचा बटवा". घरात कुणी आजारी पडले तर तातडीने उपचार म्हणून बटव्यातील अनेक पदार्थ कामी यायचे. पण काळाच्या ओघात हा आजीबाईचा बटवा दुरापास्त झाला. असे असले तरीही केरळ येथील एक आजी आपल्या याच बटव्यासाठी प्रसिद्ध आहे. त्या आजीचा प्रेरणादायी प्रवास. आजच्या भागात जाणून घेणार आहोत. चला तर मग...

केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम जवळील कोलार या छोट्याशा खेड्यात 1943 साली आजीबाईचा जन्म झाला. आजी काणी जमातीच्या आदिवासी कुटुंबातील. त्यामुळं जंगलाशी त्यांचं अतूट नातं. 1950 साली आजीबाई शाळेत दाखल झाल्या. शाळेत दाखल होणाऱ्या त्यांच्या भागातील हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्यांपैकी एक.

आजीची आई पारंपरिक वैद्य चिकित्सक होती. शिवाय ती उत्तम दाई होती. आजीला वेगवेगळ्या वनस्पतींपासून औषधे बनविण्याचे तंत्र आईनेच शिकविले. वयाच्या 28 व्या वर्षांपासून जंगलात अनेक किलोमीटर चा प्रवास करून वनौषधी शोधणे,त्या वनौषधी चे संवर्धन करणे, जोपासणे, त्यापासून औषधे बनविणे आणि ते गरजूंना देणे. हे काम अतिशय आवडीने आणि ना थकता करू लागली. हळूहळू आजीचा बटवा समृद्ध होऊ लागला आणि तिच्या बटव्यात पाचशेहून अधिक औषधी जमा झाल्या.पण,

एक दिवस आजीच्या आयुष्यातील सर्वाधिक वेदना देणारा ठरला. तिच्या मुलाला सर्पदंश झाला. तिच्या कडे सर्पदंशावर वनौषधी उपलब्ध नसल्यामुळे, मुलांला दवाखान्यात न्यायची वेळ आली.पण, जंगलात खूप आत राहत असल्याने आणि पक्का रस्ता नसल्याने तिच्या मुलाचा दवाखान्यात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. याचा तिच्यावर प्रचंड मोठा आघात झाला आणि तिने सर्पदंशावर वनौषधी शोधण्याचा निश्चय केला.

खूप मेहनत करून, प्रचंड शोधाशोध करून शेवटी तिने सर्पदंशावर वनौषधी शोधलीच. तिच्या या वनौषधीचा परिसरातील लोकांना निश्चितच फायदा होऊ लागला. यामुळे लोकांचे प्राण वाचवले. म्हणूनच परिसरात ती "विष उतरवणारी"(Poison Healer) म्हणून प्रसिद्ध झाली. ती "विष उतरवणारी" आजी म्हणजेच "लक्ष्मीकुट्टी" होय.

गेली पाच दशकं लक्ष्मीकुट्टी वनौषधी शोधणे, जतन करणे,संवर्धन करणे, प्रसार करणे, लोकांना देणे यासारखी कामे प्रामाणिकपणे करत आहे. म्हणूनच केरळ सरकारने 1995 साली नट्टू वैद्य रत्न पुरस्कार देवून तर भारत सरकारने 2018 सालचा पद्मश्री मानाचा किताब देऊन लक्ष्मीकुट्टी यांचा सन्मान केला आहे. 

माणसासमोर समस्या उभी राहिली तर त्याच्यासमोर तीन मार्ग असतात. पहिला शरण जाणे, दुसरा मात करणे आणि तिसरा जे आपल्या वाट्याला आले,ते  इतरांच्या वाट्याला येऊ नये. यासाठी पर्याय निर्माण करणे. लक्ष्मीकुट्टी यांनी तिसरा मार्ग निवडला म्हणूनच सर्पदंशावर रामबाण उपाय त्या शोधू शकल्या. "मन की बात" या कार्यक्रमात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत, लक्ष्मीकुट्टी उल्लेख करून गौरव केला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
तोपर्यंत नमस्कार.

धन्यवाद,
श्री संदीप पाटील, दुधगाव.
9096320023.




🎯 डॉ. तात्याराव लहाने यांचा प्रेरणादायी प्रवास वाचण्यासाठी 👇 येथे क्लिक करा.
https://sandeepbalgondapatil.blogspot.com/2018/11/4.html

No comments: